https://photos.app.goo.gl/bmMwQRUef4Ty1of46 33 केव्ही वीजवाहिनीखालील अतिक्रमण हटवून ग्रामस्थांनी रस्ता केला मोकळा
कवडीपूर (ता. पुसद) येथे नागरिकांची सामूहिक कारवाई; प्रशासनाकडे वारंवार तक्रारीनंतरही प्रतिसाद नसल्याची भावना
पुसद तालुक्यातील मौजा कवडीपूर येथील जिजामाता चौक शेत सर्वे नं. 58/2 मधील 33 केव्ही वीजवाहिनीखालील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात परिसरातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत सामूहिकरीत्या अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्लॉटिंगमधून 33 केव्ही वीजवाहिनी गेल्यामुळे लेआऊट विकसित करताना त्या ठिकाणी रस्ता राखीव ठेवण्यात आला होता. तसेच रस्त्यालगतच्या दोन्ही प्लॉटधारकांना खरेदी दस्तऐवजामध्ये रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण करू नये, अशी स्पष्ट अट नमूद करण्यात आली होती. मात्र, लीला यशवंत रिठे (परिचारिका, कृषी विभाग पुसद) तसेच भोरकडे बाई (कृषी सहाय्यक) यांनी संगनमत करून लोखंडी खांब उभारून वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या अतिक्रमणामुळे मागील चार महिन्यांपासून परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. बांधकाम साहित्य ने-आण, बोअरवेल मशीनची वाहतूक, पिण्याच्या पाण्यासाठी ये-जा, शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांना तसेच दैनंदिन रहदारीला अडथळा निर्माण होत होता.
या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे वारंवार तक्रारी दिल्या होत्या. सरपंच मयूर राठोड यांच्या पाठपुराव्यानंतर भूमी अभिलेख विभागाने मोजणी करून संबंधित जागेची हद्द निश्चित केली व तेथे रस्ता असल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तरीही अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
अखेर त्रस्त झालेल्या महिला, पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत गांधीगिरीच्या मार्गाने संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. यावेळी “माझे गाव, माझी समस्या” असा नारा देण्यात आला.
सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना अतिक्रमणासारखे प्रकार घडल्यास जनतेत नाराजी निर्माण होते, अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. भविष्यात ही समस्या पुन्हा उद्भवल्यास पुसद येथील महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक यांच्याकडे संबंधित दोघींना शासकीय सेवेतून पदमुक्त करण्याची तक्रार करण्याचा ठराव ग्रामस्थांनी सर्वानुमते घेतला आहे.
आंदोलनासाठी ग्रामस्थ वंदना भिसे पुनम राऊत मंगल वाघुळ उज्वला तायवाडे नंदा लेले पार्वती धनवे सौ साठे सागर मालपाणी प्रेम जाधव नितीन तायवाडे नारायण भिसे राष्ट्रपाल शिरसाट वासुदेव साठे दीपक लोखंडे डी एन देवकते वामन वाहुळे मनोज हरसुलकर प्रशांत राऊत प्रमोद मोहे दशरथ बेले श्री गोवाडे दयाशंकर बेले यांच्यासह शेकडो लोकांनी पुढाकार घेतला





Post a Comment